पाणीगळतीकडे दुर्लक्ष : अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
जाधववाडी – शहरात एक वर्षापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरात व उपनगरांमध्ये पावसाळ्यात देखील पाण्याची समस्या कायम आहे. तरी देखील महापालिका प्रशासन व्हॉल्व्हमधून होणाऱ्या पाणीगळतीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
जाधववाडी येथील जाधवसरकार चौकात असलेल्या पाण्याच्या व्हॉल्व्हमधून गळती सुरू आहे. त्या गळक्या व्हॉल्व्हमधून येणाऱ्या पाण्यावर येथील अनधिकृत उभारलेल्या हातगाड्या, इतर व्यावसायिक यांची पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे येथे अनधिकृत व्यावसायिक वाढू लागले आहेत. परंतु शहरात काही ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाणीगळती होत आहे त्याचा इतर कोणालाच उपयोग होताना दिसून येत नाही. काही ठिकाणी डांबरीकरण झाल्याने व्हॉल्व्हची उंची कमी झाली आहे व रस्त्याची उंची वाढली आहे. ह्याकारणाने पाणी रस्त्यावर येत नाही. त्यामुळे ही पाणीगळतीची बाब लक्षात येत नाही. दुभाजकांच्या कडेला असलेल्या झाडीत हे पाणी वाया जात आहे.
एकीकडे महापालिकेने काटकसर करीत एकदिवसाआड पाणीपुरवठा मोहीम संपूर्ण शहरात राबविली असे असताना दुसरीकडे मात्र शहरभरात अनेक ठिकाणी अशा व्हॉल्व्हमधून पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील व्हॉल्व्हची तपासणी करून गळके व्हॉल्व्ह बदलून त्या ठिकाणी नवीन बसवावेत. जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.