पंधरा दिवस चालणार अभियान : करोनामुळे इतर आजारांकडे झाले होते दुर्लक्ष
पिंपरी – कुष्ठरोग व क्षयरोग (टीबी) या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरात 15 दिवसांचे अभियान चालवले जाणार आहे. यामध्ये 4 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या शोध मोहिमेचे आज उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत शहरात कुष्ठरोग व क्षयरोगी शोधण्यात येणार आहेत. राज्यातील कोविड 19 च्या आपत्कालिन परिस्थितीमुळे कुष्ठरोग व क्षयरोग असलेल्या रुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने रुग्णांच्या लवकर निदानासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे निदान व औषधोपचार वेळेत होणे आवश्यक आहे. तसेच इतरांना या रोगाची लागण होण्याची साखळी अखंडित राहते. त्यासाठी समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेवून निदान करणे व औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनेही शहरात हे शोध अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील अती जोखमीच्या एकूण 4,49,750 लोकसंख्येची सर्व्हेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी अंदाजे 89,950 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून या मोहीमेसाठी एकूण 257 टीम व 52 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजातील निदान न झालेले कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकर शोधून संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने हे सीबीनॅट/ट्रयुनॅट मशिनव्दारे व एक्सरे तपासणी करणे व रुग्णांना त्वरीत मोफत औषधोपचार करणे तसेच क्षयरोग व कुष्ठरोगा विषयी जन जागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी व स्वंयसेवक यांना सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, ताण येणे, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्तजाणे, मानेवर गाठ असणे अशी लक्षणे आढळून आल्यास संशयित म्हणून नोंद घेऊन पुढे थुंकी नमुन्याची तपासणी एक्सरे व सीबीनॅट तपासणी मोफत केली जाणार आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावर चट्टे, हातापायाला मुंग्या येणे, स्नायूमध्ये अशक्तपणा येणे, बधीरता येणे, भुवयाचे केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात – तळपायात बधीरता जाणवणे अशी लक्षणे असणाऱ्यांची पुन्हा एकदा शास्त्रोक्त तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.