महापालिकेचा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार
पिंपरी – विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेचे कामकाज खोळंबले आहे. मात्र, आचारसंहितेमध्ये शिथिलता मिळवून काही कामांसाठी परवानगी घेण्यासाठी महापालिकेचा खटाटोप सुरू झाला आहे. पदाधिकारी, नगरसेवकांच्या दबावामुळे प्रशासनाने जिल्हा निवडणूक अधिकारी व विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र, नियमानुसार कोविड वगळून इतर कोणत्याही कामांसाठी आचारसंहिता शिथिल करता येणार नसल्याचे स्पष्ट आहे.
आचारसंहिता लागू झाल्याने महिनाभर धोरणात्मक निर्णय आणि कामांना मान्यता देता येणार नाही. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजावर झाला. परिणामी, शहरातील सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रशासनावर दबाब आणत आचारसंहिता शिथिलतेसाठी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार करून कामकाजात शिथिलता मिळविण्यासाठी खटाटोप केला आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या उत्तरात स्पष्टपणे कोविड व नैसर्गिक आपत्ती वगळता इतर बाबतीत आचारसंहितेचे नियम लागू राहतील, असे नमूद केले आहे. तर, अत्यावश्यक बाबतीत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही नमूद आहे. त्यामुळे पालिकेने खटाटोप करूनही आचारसंहितेत शिथिलता मिळण्याची शक्यता विरळ आहे.
आदर्श आचारसंहितेत बंधनकारक असलेल्या नियमानुसार सभांचे आयोजन व कामकाज होणार आहे. अद्यापपर्यंत आचारसंहितेत शिथिलतेबाबत कोणताही निर्णय पालिकेस प्राप्त झालेला नाही.
– उल्हास जगताप, नगरसचिव, पिंपरी पालिका