शिथिल लॉकडाऊनचा परिणाम : मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ
पिंपरी (प्रतिनिधी) – “लॉकडाऊन’च्या काळात शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण खूपच कमी झाले होते. परंतु महसूल मिळविण्यासाठी सरकारने दारू विक्रीला परवानगी देताच गुन्हेगारीचा आलेख पुन्हा एकदा उंचावला आहे. दारू विक्रीची परवानगी मिळाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच खून झाले. त्यापैकी चार खूनांसाठी दारू कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. तसेच दारू विक्रीला परवानगी मिळाल्यापासून शहरात मारहाणीचे प्रकारही खूपच वाढले आहेत.
खूनाची पहिली घटना रहाटणी येथे 9 मे रोजी घडली. दारूड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून मातृदिनाच्या पूर्व संध्येला त्याच्या आई-वडील आणि भावाने कट रचून विजय रामदास वखरे याचा दोरीने गळा आवळून खून केला.
खूनाची दुसरी घटना रविवारी (दि. 17) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली. संतोष कुलकर्णी हा तरुण दारू पिऊन चालला होता. तर गणेश थोरात हा दारू पीत बसला होता. किरकोळ कारणावरून त्याची बाचाबाची झाली. दारूच्या नशेत झालेल्या भांडणात आरोपी गणेश थोरात याने संतोष कुलकर्णी याचा डोक्यात दगड घालून खून केला.
खूनाची तिसरी घटना पुनावळे येथील रविवारी (दि. 17) रात्री घडली. महाकाली गॅंगचा म्होरक्या मनोज ऊर्फ डिंगऱ्या ढकोलिया आणि त्याचा मित्र आदम खान हे दोघेजण दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून डिंगऱ्या याचा खून केला.
खूनाची चौथी घटना देहूगाव येथे सोमवारी (दि. 18) दुपारी उघडकीस आली. सुनिल रामराव मरजकोले हा तरुण आपल्या तीन मित्रांसोबत दारू पिण्यास बसला होता. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. तिघांनी मिळून सुनील याचा खून केला. तसेच त्याचा मृतदेह पोत्यात बांधून इंद्रायणी नदीत टाकला.
गुन्ह्यांचा पाऊस….
शहरात घडलेल्या पाचपैकी चार खूनाला कारणीभूत दारू असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तसेच पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करणे, वाहनांची तोडफोड करणे, वाहने जाळण्याचे प्रकारही घडू लागले आहेत.
लॉकडाऊन सुरू असताना 22 मार्च आणि 2 मे या दिवशी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील कोणत्याच पोलीस ठाण्यामध्ये एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. इतर दिवशी एक किंवा दोनच गुन्हे दाखल होत होते. मात्र 5 मे रोजी लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांचा अक्षरशः पाऊसच पडला. यादिवशी तब्बल 19 गुन्ह्यांची नोंद झाली होती.