गतवर्षीपेक्षा 13 टक्क्यांनी वाढ : पालिका शाळांचा निकाल 94.11 टक्के
18,306 पैकी 18030 विद्यार्थी उतीर्ण; 97. 29 टक्के मुले तर 98.89 टक्के मुली उत्तीर्ण
पिंपरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल बुधवारी (दि. 29 ) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा निकाल 98.49 टक्के लागला आहे. या वर्षी शहराचा निकाल 13 टक्क्यांनी वाढला आहे. मुलांचा निकाल 97.29 तर मुलींचा निकाल 98.89 टक्के इतका लागला आहे.
शहरात दहावीच्या परीक्षेसाठी शहरातील 188 शाळांमधील 18,326 विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यापैकी 18,306 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 9627 मुले व 8679 मुली परीक्षेस बसल्या होत्या. यापैकी 18030 विद्यार्थी पास झाले आहेत. शहरातील 9447 मुले व 8583 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मागीलवर्षी शहराचा निकाल 85.49 टक्के इतका लागला होता. त्यामुळे यंदा निकालात 13 टक्कयांनी वाढ झाली आहे. मागीलवर्षी 82.62 टक्के मुले व 90.94 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. यावर्षी निकाल वाढत 97. 29 टक्के मुले तर 98.89 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
यावर्षी महापालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी निकालामध्ये बाजी मारली आहे. मागीलवर्षी महापालिका शाळांचा निकाल सर्वात कमी म्हणजे फक्त 66 टक्के लागला होता. तर 2018 साली 85.01, 2017 मध्ये 82.21 टक्के व 2016 मध्ये 87.93 टक्के निकाल लागला होता. या सर्व निकालांची परंपरा मोडत यावर्षी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. यंदा महापालिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल 94.11 टक्के लागला आहे.
शहरात महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या 18 शाळा आहेत. या शाळांमधून 2013 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 1895 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 136 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 90 ते 100 टक्के गुण मिळालेले 20 विद्यार्थी आहेत. 85 ते 89 टक्के गुण मिळालेले 99 तर 80 चे 84 टक्के गुण मिळालेले 135 विद्यार्थी आहेत. 18 शाळांपैकी 6 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
त्यामध्ये संत तुकारामनगर, खराळवाडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरीनगर, आकुर्डी येथील महापालिकशाळांच्या शाळांचा समावेश आहे. तर सर्वात कमी निकाल वाकड येथील शाळेचा लागला असून त्या शाळेचा 80.37 टक्के निकाल लागला आहे. यावर्षी करोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. सरासरी गुण देण्यात आले, तसेच टक्केवारी देखील “बेस्ट ऑफ फाइव्ह’च्या आधारे ठरविण्यात आली.