महापालिकेचे आवाहन : संसर्गजन्य आजार होण्याची भीती
पिंपरी – पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना आलेला पूर ओसरला असला, तरीही नागरिकांना हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया आदींसारखे संसर्गजन्य आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे.
गेली कित्येक दिवस पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना पूर आला. अनेक सोसायट्या, चाळी, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. आता हा पूर ओसरला असला, तरीही नागरिकांना साथीचे आजार होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी !
घरात पाणी साठविण्याच्या भांड्यांतील पाणी वापरून भांडी कोरडी करा, त्यानंतर पुसूनच त्यामध्ये पाणी भरा, घरातील मोठ्या पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवा, फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजच्या खालील ट्रे मधील पाणी दर आठवड्याला काढा, अंगणातील, गच्चीवरील भंगार मालाची त्वरीत विल्हेवाट लावा, घराभवतीची पाण्याची डबकी बुजवा किंवा त्यातील पाणी वाहते करा, आजुबाजुची डासोत्पती स्थानांबाबतची माहिती महापालिका आरोग्य विभागाला कळवा, त्या ठिकाणी औषध फवारणी करा.
विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालवा लागणार आहे. त्यापासून संरक्षण होण्यासाठी आणि डास चावू नये, यासाठी उत्पत्तीस्थळे नष्ट करा आणि होणाछया या संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे.