जयपूर – राजस्थानातील सत्तारूढ कॉंग्रेसमधील पायलट गटाची नाराजी आणि अस्वस्थता पुन्हा उफाळून आली आहे. तसे असले तरी कॉंग्रेसला पुन्हा पेचात न टाकण्याचा पवित्रा त्या गटाने स्वीकारल्याचे सूचित होत आहे.
तरुण नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मागील वर्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले. मात्र, पायलट गटाची मनधरणी करण्यात कॉंग्रेस नेतृत्वाला यश आल्याने सरकार बचावले. त्या गटाचे गाऱ्हाणे ऐकून समाधान करण्याच्या उद्देशातून पक्षाने एक समितीही स्थापन केली.
आता बराच काळ उलटल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने पायलट गटातून पुन्हा नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्या गटाने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी प्रामुख्याने लावून धरली आहे. त्या गटाच्या नाराजीमुळे पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता चर्चेला आली आहे.
मात्र, अलीकडच्या काळात पायलट गटातील तीन आमदारांनी गेहलोत यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची प्रशंसा केली. त्यामुळे स्वपक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणारे पाऊल पायलट गट उचलणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत.