मुंबई – शिवसेनेच्या मुखपत्राइतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. शिवसेनेची भूमिका दररोज बदलत आहे. कधी पवार साहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने. त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी बोचरी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच अंतर्विरोधामुळे समाज मनात हे सरकार एकरुप नसल्याचे चित्र असल्याचे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, त्यांना काय करायचे ते लख लाभ, आम्ही आमचं काम करत राहू. आम्हाला सरकार पाडायची घाई नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी पाच वर्ष सरकार चालवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच हा कुणाच्याही विरोधातला दौरा नाही. सरकारला मदत करणारा दौरा आहे. यंत्रणांमध्ये समन्वय नाही. आमचा सर्व फोकस करोनावर आहे. पण चोराच्या मनात चांदणं असतं, तशी अवस्था या सरकारची आहे. त्यामुळे रोज या सरकारला सांगावं लागतं, की हे सरकार पडणार नाही. त्यांच्यातील अंतर्विरोधामुळे समाज मनात हे सरकार एकरुप नसल्याचे चित्र आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा राजकीय इगो करु नये. इतर राज्य जर परीक्षा घेत असतील, तर आपल्या विद्यार्थ्यांचं काय होईल? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. सरकार आपली जबाबदारी सातत्याने टाळत आहे. मूल्यमापन करण्याचे एक सूत्रही हे सरकार ठरवू शकले नाही. पोरखेळ करु नये, विचारपूर्वक निर्णय करावा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.