अमरावती – राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या तिन्ही पक्षांनी मिळून सकरकार स्थापन केले मात्र यांच्यामध्ये अनेक वेळा मतभेद दिसून आले. शिवसेना व कॉंग्रेसचे याआधी अनेक वेळा खटके उडाले आहेत. असे असताना आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील धुसपूस थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचली. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे.
यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं दिसले असेत, असे विधान केले आहे. ठाकूर यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमधून धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं मानले जाते आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंचावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं. टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा.
चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते. असेही त्या म्हणाल्या आहेत.
पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.