गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले उत्पन्न
कंपनीचे बारामती प्रमुख जगदीश गंधे यांची माहिती
बारामती – वाहन उद्योगातील मंदीचा फटका ऑटोमोबाइल क्षेत्राला बसला आहे. मात्र, बारामती एमआयडीसीतील पियाजिओ व्हेईकल्स कंपनीला बसलेला नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत कंपनीचे उत्पादन चांगले झाले असल्याची माहिती कंपनीचे बारामती प्रमुख जगदीश गंधे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
जगदीश गंधे म्हणाले की, वाहन उद्योगातील मंदीचा फटका ऑटोमोबाइल क्षेत्रावर बसला असून अनेक कंपन्यांमधील उत्पादना बरोबरच असंख्य कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंदीचे ओझे श्रमिकांना पेलवेनासे झाले आहे. त्याची झळ अनेक उद्योगनगरीला बसत असल्याचे वृत्त अनेक माध्यमातून कानावर येत आहे.
मात्र, बारामती एमआयडीसीत अशी कोणतीही परिस्थिती नसून पियाजिओ कंपनी सुरळीत सुरू आहे. फक्त सांगली आणि कोल्हापूर येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी दळणवळाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने केवळ ते आठ दिवस उत्पादन काही अंशी संथ गतीने सुरू होते. मात्र, त्यानंतर आजतागायत कंपनीचे काम सुरळीत व अधिक वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीतील पियाजिओ व्हेईकल्स कठीण परिस्थितीत देखील वेगवेगळ्या कल्पकतेच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेतली जात आहे. जागतिक मंदीचा फारसा परिणाम कंपनीवर जाणवत नाही. जागतिक मंदीचा फटका कंपनीला बसला नसून कंपनीवर अवलंबून असलेले लघुउद्योग देखील सुरळीतपणे सुरू असल्याचे गंधे यांनी स्पष्ट केले.