पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – पंतप्रधानाच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होऊन सहा महिने होऊन गेले परंतु ज्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन झाले आहे तेथील काम देखील अद्याप अपूर्णच आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून मेट्रोबाबत अनेक तारखा आतापर्यंत देण्यात आल्या परंतु मेट्रोचे काम वेळेत पूर्ण होत नाही. आता आणखी एक नवीन तारीख देण्यात आली असून फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याचा दावा केला जात आहे.
फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम दि.26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मेट्रोचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मेट्रोचे प्रत्यक्ष प्रवास करता येणार येईल, असेही पाटील यांनी सांगितले. पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री पाटील यांनी मेट्रो, झोपडपट्टी पुर्नवसन, स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेट्रोच्या बैठकीवेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते. मार्च 2023 अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या 33 किलोमीटरच्या मेट्रो लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडचा विचार केल्यास सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा असा अगदी लहानसा मेट्रोचा प्रवास सुरू आहे. जून 2017 मध्ये सुरू झालेल्या मेट्रोच्या कामाचा प्रवास सातत्याने लांबत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतर मेट्रो धावू शकली आहे. परंतु मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने नवनवीन आणि जवळच्या तारखा देण्यातच धन्यता मानली. एवढेच नव्हे तर ज्या मार्गाचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन करुन घेतले त्याचेही सर्व काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर सहा ते सात महिने वर मेट्रो धावत होती आणि खाली काम सुरूच होते.
उपयुक्त ठरेल की केवळ जॉय राइड?
पिंपरी ते फुगेवाडी या अत्यल्प अंतरात धावत असलेल्या मार्गावर मेट्रो केवळ एक जॉय राइड बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. दुसरीकडे ज्या मार्गावर मेट्रो धावत आहेत, त्या मार्गावर पीएमपी बस, रिक्षा, लोकल अशी अनेक सार्वजनिक वाहने धावत आहेत. त्यातच मेट्रोच्या कामाची मंद गती पाहता मेट्रो खरोखरीच उपयोगी ठरेल की केवळ जॉय राइड बनून राहिल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढत्या लोकसंख्येची गरज
पुणे, पिंपरी-चिंचवडचा महाराष्ट्रातील मोठ्या नागरी समूहात समावेश होतो. विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढीमुळे गेल्या दोन दशकात शहरात लोकसंख्या आणि रोजगारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दशकांत पिंपरी-चिंचवड परिसरात शहरीकरणात वेगाने वाढ होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या 17.27 लाख होती आणि 2017 पर्यंत लोकसंख्या 21 लाख होऊन 2028 आणि 2038 या वर्षातील लोकसंख्या अनुक्रमे 30.9 लाख आणि 39.1लाख होण्याचा अंदाज आहे. ही वाढती लोकसंख्या पाहता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे खूप गरजेचे आहे. यामध्ये मेट्रो महत्त्वाचा पर्याय ठरू शकेल, असे वाटत होते. परंतु मेट्रोच्या कामाचा वेग पाहता नागरिकांच्या पदरी मात्र निराशाच येताना दिसत आहे.
अधिकाऱ्यांकडून नुसत्याच तारखा
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉरिडोर-1 म्हणजेच पीसीएमसी ते स्वारगेट (16.598 किमी) मेट्रो मार्गिकेच्या काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु करोनासह वेगवेगळ्या अडचणींमुळे कामाचा वेग मंदावला आहे. परंतु काम संपतच आले आहे लवकरच मेट्रो पूर्ण क्षमतेने धावेल अशी आश्वासने आणि घोषणा मेट्रोच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेऊन नवी तारीख देण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. पीसीएमसीपासून रेंजहिल पर्यंत मेट्रो सुरू करण्याची टार्गेट डिसेंबर 2019 ठरविण्यात आले होते तर रेंजहिल ते स्वारगेट नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु हे सर्व दावे आणि तारखा हवेत विरल्या आहेत.