अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननसमोर केला जैनबंधावांनी मंत्रांचा जयघोष
पुणे – “अहिंसा परमो धर्म’ आणि “सर्वधर्म समभावा’चा संदेश “नवकार मंत्रा’च्या जयघोषातून गणेशोत्सवाच्यानिमित्ताने जैनबंधवांनी श्री अखिल मंडई मंडळाच्या श्रींच्या उत्सव मंडपात शनिवारी दिला. चातुर्मास, पर्युषण आणि गणेशोत्सव एकाच कालावधीत असल्याने जैनबांधवांनी एकत्र येत “विश्व शांतीसाठी नवकार मंत्रा’चा जप केला.
अखिल मंडई मंडळाच्या 126 व्या स्थापना वर्षानिमित्त जैनांचे 24 तीर्थंकरांच्या मूर्ती स्थापित करून मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिरात यंदा शारदा गजानन विराजमान झाले आहेत. तेथे झालेल्या जैन बांधवांच्या “नवकार जपा’वेळी हजारोंच्या संख्येने जैन बांधव-भगिनी उपस्थित होते.
यावेळी आचार्य भगवंत श्री विश्वरत्न सागर सूरिश्वरजी महाराजा, मुनीश्री तीर्थंरत्न सागर, मुनीश्री कीर्तीरत्न सागर, मुनीश्री उत्तमरत्न सागर, बालमुनी श्री रम्यरत्न सागर, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, सूरज थोरात, राजेश करळे, तुषार शिंदे, संकेत तापकीर, साहील मिसाळ, प्रणव मलभारे, अजय जव्हेरी, सारंग सराफ, हर्षल भोर, विकी खन्ना आदी उपस्थित होते. यावेळी तीर्थंकर जैन मंदिर साकारणारे विशाल ताजणेकर यांचा सन्मान करण्यात आला.
जैन आणि वैदिक धर्म हे सृष्टीतील सर्वांत प्राचीन धर्म आहेत. गणेशोत्सवात आज “नवकार मंत्रा’चा जप करण्याने जैन आणि वैदिक परंपरेत समांतर पूल निर्माण झाला आहे. यामुळे समाजात एकता, कारूण्य आणि प्रेमभाव स्थापित होईल.
-आचार्य भगवंत श्री विश्वरत्न सागर सूरिश्वरजी महाराज
सर्वधर्मीयांना सहभागी करून घेण्याची मंडळाची जुनी परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून जैन धर्माची “अहिंसा परमो धर्म’ची शिकवण सर्वांनी अंगिकारावी यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात प्रथमच गणेशोत्सवात तीर्थंकर जैन मंदिर साकारण्यात आले आहे.
अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ