नवी दिल्ली : काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धालाआज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय सैनिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यालाच आज 20 वर्ष पुर्ण झाले आहेत.
जवळपास दोन महिने चाललेल्या पाकिस्तानसोबतचे युद्ध हे भारतीय सैनिकांच्या साहस आणि शौर्याचे असे एक उदाहरण आहे ज्याचा प्रत्येक भारतीयांना गर्व आहे. तब्बल 18 हजार फूट उंचीवर भारताच्या जवानांनी पाकिस्तानसोबत युद्ध केले. या युद्धात 527 भारतीय जवान शहिद झाले तर 1300 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले होते. 3 मे रोजीच पाकिस्तानने आपल्या सैन्यासह कारगिलच्या डोंगराळ भागात घुसखोरी केली होती. याची माहिती भारतीय सैन्यास लागताच त्यांनी पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी जीवाची पर्वा न करता सडेतोड उत्तर दिले. त्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन विजय सुरू केले होते. या युद्धात भारताने मिग -27 आणि मिग-29 विमानांचा वापर केला होता. या विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानने ज्या भागात घुसखोरी केली आहे त्याठिकाणी मोठा बॉम्ब वर्षाव करण्यात आला होता. जगात दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा शत्रू राष्ट्रावर एवढ्या मोठ्या संख्येने बॉम्बचा वर्षाव करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय सेनेचा विरोध पाहून अखेर 26 जुलै 1999 रोजी पाकच्या सैन्यांनी माघार घेतली आणि भारतीय सैन्याने पुन्हा एकदा कारगिलवर भारतीय तिरंगा मानाने फडकावला.