मुंबई – ‘राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर दबाव टाकला. तसेच एका पोलिसाला त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी कामाला लावले होते. यड्रावकर यांना आमिष दाखविण्याचाही प्रयत्न झाला होता,’ असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केले असून जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा त्यांनी सरकारची माफी मागितली होती. पुढच्या काळात जर कुणाचे फोन टॅपिंग बाहेर आले तर त्याला रश्मी शुक्ला याच जबाबदार असतील असेही आव्हाड यांनी सांगितले. सरकारने चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ करुन आपले मोठेपण दाखवले, पण तीच आमची चूक झाली, असे आव्हाड म्हणाले.
तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आव्हाड यांनी फेटाळून लावली. मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे उच्चपदस्थ अधिकारी होते. ते स्वतःच्या बदलीसाठी मधल्या लोकांशी का बोलतील? त्यामुळे यात कोणतेही तथ्य नाही. स्वतःच माणसे पेरायची, त्यांना संभाषण करायला लावायचे आणि मग त्यांचे फोन टॅप करायचे, असे कटकारस्थान विरोधकांनी रचल्याचे आव्हाड यांनी सांगितले.