नवी दिल्ली : दिल्लीच्या बर्याच भागात झालेल्या हिंसक निदर्शनाप्रकारणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह आणि इतरांनी हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) कायद्याविरुद्ध झालेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, शाहीन बाग आणि इतर ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी,अशी मागणी वजाहत हबीबुल्लाह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. बुधवारी सुप्रीम कोर्ट त्यांच्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. तर दुसरीकडे सोमवारी मौजपूर, झफराबाद आणि इतर भागात हिंसक निदर्शने करण्यात आली होती.
मानवाधिकार कायदा नेटवर्क नावाच्या संघटनेने देखील या प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने काही राजकीय पक्षांशी संबंधित नेत्यांना अटक करण्याची देखील मागणीही केली आहे. हिंसाचाराला प्रवृत्त करणार्या नेत्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी, असे याचिकेत म्हटले आहे.