मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऍड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच हा लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट असल्याचे निरिक्षण नोंदवत पाटील यांना फटकारले आहे.
याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत, असे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, यामध्ये मास्टरमाईंट गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केला.
यावेळी जयश्री पाटील यांनी या प्रकरणात मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे सांगितले. दरम्यान, पाटील यांनी तक्रार दाखल केली असली तरी, देशमुख यांच्याविरोधत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पाटील यांच्या तक्रारीनंतर आता मुंबई पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.