मंचर -आंबेगाव तालुक्यातून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 हा मोठ्या प्रमाणावर मृत्यूचा सापळा बनला असल्याचे अपघातांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात 42 जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले असले, तरी रस्ते प्राधिकरणाने अपघात घडू नये. यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
या महामार्गावरील पेठ ते कळंबदरम्यान पाच ठिकाणी आतापर्यंत अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जखमी होऊन अपंग झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या अपघाताच्या ठिकाणांची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी, हलकी वाहने, जड वाहने, अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. यात शेतीमालाची आणि पिंपरी-चिंचवड, रांजणगाव एमआयडीसीमधून होणाऱ्या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे; परंतु कळंब 42 वा मैल, पेठ बायपास, अवसरी घाट पेट्रोल पंपासमोर, तसेच पेठ घाट या पाच ठिकाणी मागील तीन ते चार वर्षात अनेक अपघात घडले आहेत. या पाचही ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून रस्त्यासाठी बनवलेले दुभाजक तुटलेले असल्यामुळे वारंवार प्राणांतिक अपघात घडत आहेत.
पाच वर्षांत 42 जणांनी जीव गमवला
मंचर पोलीस ठाणे हद्दीत 2015 ते मार्च 2020 या पाच वर्षात याठिकाणी 42 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 72 गंभीर स्वरूपाचे मोटार अपघात झाले आहेत. मार्च 2019 ते मार्च 2020 या वर्षांत 29 जणांचा या ठिकाणच्या अपघातात मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत.
मंचर पोलीस ठाण्यामार्फत आतापर्यंत जानेवारी 2018, ऑक्टोबर 2018, डिसेंबर 2018, जून 2019 दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना लेखी सूचना देऊन देखील कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. पेठ-कळंबदरम्यानच्या अपघातांच्या पाच ठिकाणी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. या अपघातांत होणारी जीवितहानी व प्रवाशांना येणारे अपंगत्व, मालमत्तेचे होणारे नुकसान यांचा विचार करून येथील रस्त्यांची डागडुजी, सूचना फलक लावणे, दुभाजकांची डागडुजी, झेब्रा क्रॉसिंग रबर पट्ट्या व इतर आवश्यक उपाययोजना त्वरीत करणे गरजेचे आहे.
– कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक, मंचर