पेठ (प्रतिनिधी) – करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून वातावरणात ढगाळ झाल्याने व पाऊस पाडण्याइतपत वातावरणात अंधार झाल्याने लोकांनी अधिक धास्ती घेतली आहे. सातगाव पठार भागात करोना या संसर्गजन्य आजाराची धास्ती घेऊन लोक आपापल्या घरांमध्ये बसलेली आहेत .गावातच काय पण वाड्यावस्त्यावर सर्व रस्ते ओस पडले आहेत.
त्यातच आज दुपारपासून सातगाव पठार परिसरामध्ये वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. असेच वातावरण साधारण दोन-तीन दिवसापासून दुपारी बदलताना दिसून येत आहे. आकाशामध्ये ढग दाटून आले आहेत. आणि सर्वत्र अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगांमध्ये विजांचा कडकडाट जाणवू लागला आहे. वारे वाहू लागले आणि बारीक पावसाला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणामुळे लोकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रमावस्था तयार झाली आहे .
मार्च महिन्यामध्ये हवामानानुसार कडक उन्हाळा जाणवायला पाहिजे होता. जेणेकरून लोकांना अपेक्षा आहे की करण्याचे विषाणू तापमान वाढल्यानंतर टिकणार नाही. पण ह्या अपेक्षेवर ह्या अवकाळी पावसाने पाणी फिरताना कुठेतरी दिसून येत आहे यामुळे रोगराई अजून पसरेल की काय अशी शंका लोकांच्या मनामध्ये जाणवू लागली आहे आणि नागरिक चिंताग्रस्त होऊन बसले आहेत.
सातगाव पठार भागांमध्ये पिकांचे जास्त नुकसान होणारे नसले तरी सातगाव पठार भागांमध्ये प्रामुख्याने ज्वारी आणि बाजरी त्याच बरोबर बटाटा हे प्रमुख पिके असतात .बागायत क्षेत्र कमी असल्यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान जरी होणार नसले तरी ह्या वातावरणाचा लोकांनी दसका घेतलेला दिसून येतो.वातावरणात झालेला बदल हा अत्यंत धोकादायक असल्याचे मत डॉ ताराचंद कराळे यांनी सांगितले असून नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे असे आवाहन केले आहे.