पुण्यातील नागरिकाला हायकोर्टाचा दिलासा
मुंबई : सध्या देशात टाळेबंदी लागू करण्यात आली असताना वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आसाम येथील लंका येथे जाणासाठी परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या पुण्यातील याचिकाकर्त्यांला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सध्या सर्व विमान सेवा बंद असल्याने पर्यायी महामार्गाने जाण्यासाठी संबंधीत विभागाने परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी घोषित केल्याने विमान, रेल्वे आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बिन्नी ढोलाने वडीलांच्या अंतसंस्कारासाठी आसाम येथील लंका गावी जाण्यासाठी एखादे खासगी विमान किंवा व्यावसायिक विमान उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. के. मेनन यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी झाली.
यावेळी केंद्र सरकारच्या वतीने सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी भूमीका स्पष्ट करताना केवळ याचिकादारच नाही तर करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटवर्तीयांकडूनही अशा मागण्या केल्या जात आहेत. मात्र सध्या रेल्वे आणि विमान सेवा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे त्याची परवानगी याचिकादाराला मिळणार नाही. परंतु त्यांची इच्छा असल्यास त्यांना महामार्ग मार्गे जाण्याची परवानगी आणि व्यवस्था केली जाईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने याची दखल घेऊन याचिकाकर्त्यांला महामार्गावरून प्रवास करण्यासाठी संबंधीत विभागाकडे अर्ज करून परवानगी घेण्याचे निर्देश दिले. तसेच जाण्याचा सविस्तर मार्गही दाखल करावा म्हणजे आंतरराज्य सीमेवर अडचण येणार नाही, असेही याचिकादाराला बजावले.