मुंबई : राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी काळात मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद मुख्यमंत्र्यांनी संवाद साधताना ते बोलत होते.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लाॅकडाऊन लावावा लागला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र, आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत.
राज्यात आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे, तेथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण ४० टक्क्यांहून अधिक आहेत ते सर्व जण लेव्हल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाचे चित्रीकरण केले जाऊ शकते. परंतु, त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायो बबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करणे आवश्यक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.