पणजी – गोव्यात येणाऱ्या नागरिकांना करोनाविषयक चाचणी करण्याची सक्ती करण्यात आली होती, येत्या गुरुवारपासून त्यांना ही चाचणी न देण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे, त्यांच्या चाचण्यांसाठी संबंधित यंत्रणांवर ताण पडत आहे. त्यामुळे ज्यांच्यात कोणतीच लक्षणे दिसत नाहीत त्यांना ही चाचणी न देण्याची मुभा देण्यात आली आहे, पण अशा नागरिकांना चौदा दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात येणाऱ्यापैकी ज्यांनी चाचणी घेण्यास अनुमती दिली आहे त्यांना चाचणीचा अहवाल येईपर्यंत संबंधित संस्थेत क्वारंटाईन राहावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात येताना आयसीएमआर संबंधित प्रयोगशाळेचा कोविड चाचणीचा दाखला नागरिकांनी आणावा अशी सुचनाही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, गोव्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनर टेस्ट केली जाईल. त्यात त्याला करोना सदृश लक्षणे दिसून आली तर त्याला लगेच क्वारंटाईन क्षेत्रात नेले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. येत्या 11 जून पासून हे नियम त्या राज्यात लागू केले जात आहेत.