सुरेश डुबल
नानांविरोधी गटाची खेळी यशस्वी; ते लांब झाले नाहीत, केलं गेलंय
कराड – तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा उजवा हात म्हणून आनंदराव नानांची राज्यात ओळख. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक जणांना याचा धक्का बसला. मात्र नानांना आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून बाजूला करण्यासाठी कॉंग्रेसमधीलच काहींनी परफेक्ट फिल्डिंग लावल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने चव्हाण यांनी दिल्ली गाठली. तेथेच ते रमले. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षानंतर कॉंग्रेसमधील अस्थिरतेचा फायदा थेट पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय हालचालींमुळे मुख्यमंत्री पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव पुढे आले. पंधरा वर्ष दिल्लीत रमलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात यावे लागले. मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांची निवड झाल्यापासून आनंदराव पाटील नेहमीपेक्षा जास्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकट गेले.
महाराष्ट्रातील कोणाचे कोणतेही काम मुख्यमंत्र्यांकडे असेल तर, प्रथम त्याला आनंदराव नानांना ते संबंधित काम सांगणे आवश्यक होते. नानांना भेटल्याशिवाय पृथ्वीराज चव्हाणांची भेट होतच नव्हती. यामुळेच कॉंग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्या. यातूनच नानांना बाजूला करण्याची फील्डिंग लागली. पृथ्वीराज चव्हाण जोपर्यंत मुख्यमंत्री होते, तोपर्यंत त्यांच्या नाना व्यतिरिक्त अन्य जवळच्या पदाधिकाऱ्यांना देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यास वेळ मिळत नव्हता.
प्रथम नानांना भेटा, मग पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जावा. यामुळे कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी अतिशय नाराज झाले होते. पृथ्वीराज चव्हाण कार्यकाळ संपल्यानंतर आनंदराव नानांना पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून बाजूला करायचे, हे अन्य नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ठरवले होते.
यादरम्यान कॉंग्रेसची बरीच पडझड झाली. जिल्हाध्यक्ष पदावरून जिल्ह्यात नाट्य सुरू झाले. या घडामोडीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला शब्द नानांनी पाळला, आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या घडामोडीत कॉंग्रेसचे नेते जयकुमार गोरे यांना जिल्हाध्यक्ष पद न मिळाल्याने हे देखील कमालीचे नाराज झाले. पक्षाचे नुकसान व्हायला नको, म्हणून पृथ्वीराजबाबांनी जयकुमार गोरे व नानांना थांबवून अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली. मात्र जयकुमार गोरे यांनी परफेक्ट नियोजन करून त्यांचे मित्र रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेच्या आधी अचूक टायमिंग साधत भाजपमध्ये पाठवले. त्यामुळे कॉंग्रेसचा पुरता बट्ट्याबोळ झाला.
नेमकं येथेच नानांना बाबांपासून बाजूला करायची खेळी सुरू झाली. जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांनी मग नानांना डिवचणे सुरू केले. कॉंग्रेसच्या कार्यक्रमात नानांना बोलू न देणे, कार्यक्रमाचा निरोप फक्त एसएमएसने सांगणे, या व अशा कुरघोड्या यांच्या विरोधात सुरू झाल्या. या आधीपासूनच होत्या, मात्र अलिकडच्या काळात यात मोठी भर पडली. ही सल नानांना जिव्हारी लागल्याने नाना बाजूला न करता ते स्वतःहूनच कॉंग्रेसमधून बाजूला झाले.