नवी दिल्ली – कच्च्या तेलाचे दर उच्च पातळीवर असतानाच भारतातील किरकोळ आणि घाऊक महागाईच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे लवकरच व्याजदर वाढ अटळ असल्याचे विश्लेषकांना वाटते. फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई 6.07 टक्के मोजली गेली आहे.
जानेवारी महिन्यात या महागाईचा दर 6.01 टक्के इतका होता. रिझर्व्ह बॅंकेने ही महागाई सहा टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केला आहे. मात्र त्यापेक्षाही महागाई थोडी जास्त वाढली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला व्याजदर वाढीशिवाय पर्याय दिसत नाही.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात अन्नधान्य वगळता इतर वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई निर्देशांक 13.11 टक्के इतका नोंदला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये यामध्ये काही प्रमाणात घट होत असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये या महागाईच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिल 2021 पासून म्हणजे 11 महिन्यापासून या महागाईचा दर 10 टक्क्यापेक्षा जास्त आहे.
रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चे तेल महागले असून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ केली नसली तरी महागाईचा परिणाम जाणवू लागला आहे. जर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ केली तर महागाई उच्च पातळीवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये खनिज, रसायने, नैसर्गिक वायू इत्यादीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे ही महागाई वाढली असल्याचे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.