- उत्पादन घटल्याने भाव भिडले गगनाला
- आंध्र प्रदेश, तेलंगणातून मिरचीची आवक
पिंपरी – महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे मिरची उत्पादनात घट झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजारात यावर्षी लाल मिरचीचा ठसका वाढला आहे. या ठसक्याने किचनचे बजेट कोलमडल्याने गृहणी मात्र बेजार झाल्या आहेत. लाल मिरचीचे मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत.
शहराच्या बाजारात मागील काही दिवसांपासून लाल मिरचीच्या दरामध्ये तेजी आली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आवकाळी पाऊस झाल्याने मिरचीच्या उत्पादनात घट झाली. परिणामी दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहराच्या बाजारपेठेत मिरचीचे दर प्रतिकिलो 100 रुपयांवरून थेट 260 ते 350 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर सरासरी प्रतिक्विंटल 15 ते 30 हजार रुपये व्यापाऱ्यांना मोजावे लागत आहेत.
यावर्षी महाराष्ट्रामध्ये मिरची उत्पादन घटल्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे शहरात तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतून मिरचीचा पुरवठा होत आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजारात लाल मिरची 120 ते 140 रुपये किलोप्रमाणे मिळत होती. सध्या हेच दर 240 ते 260 रुपयांपर्यंत वाढले आहेत. देट काढलेल्या मिरचीसाठी तर 340 ते 350 रुपये प्रतिकिलोप्रमाणे मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना मिरचीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे, गृहणीमधून मात्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गतवर्षापेक्षा दुप्पट भाव
दरवर्षी उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते मे महिन्यामध्ये ग्रहणींकडून वर्षभर पुरेल एवढी मिरची खरेदी केली जाते. मिरची खरेदी केल्यानंतर त्यापासून लाल, काळे तिखट बनविले जाते. त्यामुळे मिरचीची खरेदी केली जाते. सध्या मिरचीचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मागील वर्षी घाऊक बाजारात मिरची प्रतिक्विंटल 10 हजार रुपयेप्रमाणे खरेदी केली. मात्र यावर्षी त्यासाठी प्रतिक्विंटल 30 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्रात तसेच तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये दुष्काळी परिस्थित असल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्यातही मिरचीचे दर असेच चढे राहण्याची शक्यता आहे. सध्या तरी भाववाढीमुळे मिरचीला अपेक्षित मागणी अद्याप नाही.
– नितीन ब्राह्मणकर, मसाला व्यापारी, पिंपरी