श्रीगोंदा – राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलून राज्यपालपदाची गरिमा घालविली असून मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. लोक प्रतिनिधींनी आजारपणाचे सोंग घेतले असून तालुक्याच्या प्रश्नाबाबत आणखी किती दिवस आजारपणाचे सोंग घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत झोपलेल्या सरकारला आणि अधिकाऱ्याला जाग करण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या दुर्दशेशी कोणतेच घेणे देणे नसल्याची टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहटा, हरिदास शिर्के यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे लांबच या उलट शेतकऱ्यांना विजेच्या बिलासाठी वेठीस धरले जाऊन वीजबिलासाठी अधिकाऱ्यांकडून रोहित्र उतरविले जात असल्याने अधिकाऱ्यांचे तसेच या सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे. लोकप्रतिनिधींनी आजारपणाचे सोंग घेतले असून तालुक्याच्या प्रश्नाबाबत आणखी किती दिवस आजारपणाचे सोंग घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या समस्यांवर हे बोलायला तयार नाहीत. तालुक्यात असा एखादा रस्ता दाखवा ज्यावर खड्डाच नाही. यासारख्या विविध प्रश्नावर तालुक्याचे लोक प्रतिनिधी बोलायला तयार नाहीत.
मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन “टायगर अभी जिंदा है’, या सारख्या घोषणा देत आहेत. हे सरकार नागरी समस्यांबाबत बेशरम झाले असल्याची टीका जगताप यांनी केली. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असल्याने शासनाने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, जून ते ऑक्टोबर या कालखंडातील शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे, अतिवृष्टीमुळे रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करावी,
शेतकऱ्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणारे मुलांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, तसेच लंपीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. गायरान व शासकिय जागेवरती गरीब नागरिकांनी घरे बांधलेली आहेत, ती अतिक्रमणे ठरवून डिसेंबर अखेर काढण्याचा आदेश रद्द करावा, अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडले जाईल, असे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी सांगितले.
ओला दुष्काळ जाहीर करावयाची गरज नाही असे सांगणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेती कशी करायची याची माहिती दिली तर माझ्यासारखं कार्यकर्ता राजकारण सोडून देईल. लोणी व्यंकनाथ ते पारगाव फाटा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. या रस्त्याच्या कामावर विखे पाटील सारख्या राजकारण्यांनी देखील दुर्लक्ष केल्याची टीका राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी केली.