सरदवाडीत शेतकऱ्यांमधून अजूनही भीती : दिवसा वीजपुरवठा द्या
टाकळी हाजी – शिरूर तालुक्यात सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कांद्यासाठी पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे. बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी रात्री घराबाहेर पडणे अवघड झाले असून, कधी बिबट्या हल्ला करेल त्याचा भरवसा नाही. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी दिवसा वीज द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार गावडे यांनी दिला आहे.
दरम्यान, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने कृषीपंपाला दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे. सरदवाडी (जांबूत, ता. शिरूर) येथे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, शेतकरी अजूनही बिबटयाच्या दहशतीमुळे आहे.
महिन्यापूर्वी सरदवाडी (जांबूत) येथील लहान मुलीला बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वन विभागाने या परिसरात सात पिंजरे लावले. दहा दिवसांपूर्वी त्यामध्ये एक बिबट्या सापडला होता. त्यानंतर लगेच दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही धास्ती सतावत आहे.
उसाचे आगार बनले आश्रयस्थान
जांबूत परिसरात घोड व कुकडी नदीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र व मुबलक पाणी असल्यामुळे जांबूत, वडनेर, टाकळी हाजी, निमगाव दुडे, कवठे येमाई, परिसरात बिबट्याचे अनेकवेळा दर्शन होत आहे. शेतकरी दहशतीच्या छायेत वावरत आहे. शेतीमधील घरांभोवती नागरिक जाळ्या मारल्या जात आहेत. तरीही बिबट्याचा हल्ला मजबूत असल्यामुळे अनेकवेळा जायबंदी करण्याचे काम बिबट्या करीत आहे.
जांबूत परिसरात बिबट्याने ठाणच मांडले आहे. यापूर्वी अनेकांवर हल्ले झाले. नदीपलीकडे चोंभूत (ता. पारनेर) हद्दीत गेल्यावर्षी शेतमजूर महिलेवर हल्ला करून ठार केले होते. येथील उस आगार बिबट्याचे आश्रयस्थान बनले आहे. त्यामुळे शेतकरी दिवसरात्र दहशतीच्या छायेत वावरत आहे.