चार वर्षांत चार हल्ले : तीन बिबट्या जेरबंद
दौंड – तालुक्यातील भीमा नदीकाठारवरील राहू बेट परिसर समृद्ध झाला आहे. नदीकाठावरून पलीकडे शिरूर तालुक्याची हद्द आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांचे अतिक्रमण, वनविभागातून झाडांची आणि आश्रयस्थानाची कत्तल आदी कारणांमुळे बिबट्या मानवी वस्तीत शिरू लागला आहे. गेल्या 20 वर्षांत जिल्ह्याच्या पश्चिम तालुक्यात विशेषत: जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे वास्तव्य आहे.
या चार तालुक्यांत बिबट्यांचे हल्ले शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहेत आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले नित्याचेच झाले आहेत. पश्चिम तालुके भयभीत असताना बिबट्याने आपले वास्तव्य आता दौंड तालुक्यात केले आहे. त्यामुळे चार वर्षांत बिबट्याचे नित्य दर्शन सुरू असले तरी त्याचे आगमन हे शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण
ठरले आहे. सुरक्षित ठिकाण, अन्न, पाण्याच्या शोधात बिबट्याने भीमा नदीकाठावरून दौंड तालुक्यात प्रवेश केल्यामुळे ही संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दौंडचा परिसर अनुकूल –
दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरातील गावे भीमा नदीकाठी वसली आहेत. त्यात या भागात उसाचे क्षेत्र लक्षणीय आहे. शिरूरचा भाग लगतच आहे, त्यामुळे बिबट्याला हा परिसर अनुकूल आहे. राहू बेट परिसरातील गलांडवाडी- पारगाव भागात एका दुचाकीस्वारांवर हल्ला केला होता. त्यानंतर केडगाव येथील एकावर बिबट्याने हल्ला केला होता. गलांडवाडी येथे दोन घटना घडल्या आहेत. त्यात शेळ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना ताज्या आहेत. कडेठाण, हातवळण आदी गावे बिबट्यांच्या हल्ल्यामुळे भयकंपीत झाला आहे.
भय इथले वाढत आहे –
दौंड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पाटस येथे रात्री वाहनाची धडक बसून बिबट्या ठार झाला. जुन्नर तालुका बिबटप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पुरंदर, दौंड हा परिघ ऊस क्षेत्रामुळे बिबट्यांच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे. या परिसरात पाणवठेही असल्याने हे क्षेत्रे बिबट्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. दौंड तालुक्यात पकडलेले बिबटे रेस्क्यू करून जुन्नरच्या माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रातच पाठवले जातात, ते पुन्हा निसर्गात सोडले जातात, त्यामुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पुरंदर, दौंड तालुक्यांत बिबट्यांचे भय वाढत आहे.
शिरूर तालुक्यातून दौंड तालुक्यात प्रवेश
गेल्या दीड महिन्यांत दौंड परिक्षेत्रातून (पारगाव) चार बिबटे पकडले आहेत. हे बिबटे जुन्नर तालुक्यातील बिबट केंद्रात सोडले आहेत. प्रत्यक्ष मानवी वस्तीवर किंवा नागरिकांवर जोपर्यंत बिबट्यांचे हल्ले होत नाहीत, तोपर्यंत वन विभागाकडून पिंजरे लावले जात नाही. जुन्नर तालुका सोडून जिल्ह्यात सर्वत्र तसा शासकीय नियम आहे. मात्र, तरी त्या त्या भागातील नागरिकांकडून मागणी आल्यास पिंजरे लावून वनाधिकारी बिबट्या पकडण्यासाठी योजना करतात.
भक्ष्य पकडण्यासाठी बिबट्या रात्रीच्या वेळेत दहा ते बारा किलोमीटर अंतरावर फिरत असतो. पाणवठा आणि लपण्याचा परिसर निवडतो. त्यामुळे बिबटे पकडणे अवघड असते. पिंजरा लावणे, हा त्यासाठी पर्याय होऊ शकत नाही, यासाठी नागरिकांनी पशुधनाची आणि स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. दौंड तालुक्यात पशुधनावर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत; पण नागरिकांवर हल्ले झालेले नाहीत, तरी बिबट्यांपासून सुरक्षेच्या दृष्टीने दौंड तालुका परिक्षेत्रात उपाययोजना केल्या जात आहेत. -महादेव हजारे, वनाधिकारी, दौंड तालुका.