संघर्ष कृती समितीची केली स्थापना
कापूरहोळ – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय राजमार्गाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासह अन्य न्याय मागण्यांसाठी शिंदवाडी ते साताऱ्यापर्यंत जन आंदोलन उभारण्याचा तसेच न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात टोल नाका हटाव संघर्ष कृती समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय राजमार्ग क्र. 4च्या संदर्भातील अनेक समस्यांबाबत विचार विनिमय करण्यासाठी, हॉटेल चिंतामणी येथे सर्वपक्षीय सामाजिक कार्येकर्त्यांची आज बैठक पार पाडली. यावेळी सदर निर्णय घेण्यात आले.
पुणे-सातारा मार्गावरील अर्धवट कामांमुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल, रस्त्यातील अर्धवट कामे तसेच खड्यांमुळे अपघात होत असल्याने टोल भरून अनेक निरापराध प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत असल्याने या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण व्हावे तसेच टोलनाक्यावर अन्य सुविधांबरोबरच होणारी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशा न्याय मागण्यांसाठी सर्वपक्षीयांसह नागरिक आक्रमक झाले आहेत.
सर्वपक्षीयांसह नागरिक एकवटले : जनआंदोलनही उभारणार
यानुसार याकरीता जन आंदोलनासह न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे निवेदन सदर संघर्ष समिती मार्फत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आहे. यानुसार संघर्ष कृती समीतीच्या वतीने लवकरच जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. सामाजिक बांधीलकी म्हणुन सर्व नागरीकांनी, प्रवाशांनी या संघर्ष कृती समितीत सहभागी व्हावे, असेही आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
सदर संघर्ष कृती समितीत सर्वपक्षीय तालुकाअध्यक्ष यांना निमंत्रीत म्हणून व सर्वपक्षीय लोकप्रतिनींधी यांना विशेष निमंत्रीत म्हणून स्थान देण्यात येणार आहेत. या वेळी दिलीप आप्पा बाठे, पोपटकाका जगताप, संजय जगताप, विलास बोरगे, बाळासाहेब गरुड, विजय जंगम, किरण भदे, माणिक पवार, राजेंद्र नानासो कोंडे, कृष्णा शिवरकर, किशोर धुमाळ, शुभम यादव, दादासो पवार, विलास येवले, महेंद्र शिंदे व परीसरातील नागरीक उपस्थित होते. या विषयावर पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि.7) चिंतामणी हाटेल, पुणे सातारा रोड, केळवडे (ता. भोर) येथे पुन्हा व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.