सासवड येथील शेतकरी मेळाव्यात डागले टीकास्त्र
सासवड – एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही. राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते, ते आम्ही केले. मग विश्वासघात कुणी केला, आम्ही केला का, हे जनता ठरवेल. आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही पायउतार झालो. मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम मी माझ्या मतदारसंघात केले आहे. असेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिलो असतो, तर यातील एकही आमदार निवडून आला नसता, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पुरंदरच्या भूमित येण्याचे मला भाग्य लाभले. छत्रपती संभाजीराजे, आचार्य अत्रे यांची ही जन्मभूमी आहे. मी काम करणारा माणूस आहे. फायली फिरतात मला त्यात रस नाही. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेचं सरकार आता आले आहे. आपण निवडणूक लढवत असताना एकीकडे मोदींचा तर दुसरीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला होता. त्यामुळेच जनतेनं आपल्याला पूर्ण बहुमत दिले होते, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगवला.
शिवसैनिकांना या अडीच वर्षांत काय मिळाले? तडीपारीची कारवाई तेवढी करण्यात आली. अडीच वर्षांत आम्हाला कुणी विचारले नाही. सामान्य शिवसैनिकाची ही भावना होती. आम्ही उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायचे का? नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चार नंबरवर फेकली गेली. शिवसेना भाजपचे सरकार आले असते तर आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कुठे राहिली असती, ते औषधालाही पुरले नसते. थोडे जरी मागे पुढे झाले असते तर आमचा कार्यक्रमच झाला असता. काही लोकांना वाटत होते या लोकांनी राजकीय आत्महत्या केली. आम्हाला दीपक केसरकर नावाचा संत माणूस भेटला. अगोदर तो माणूस अडगळीत होता, तुम्ही तो शोधून आणला. आम्ही गद्दार, बंडखोर असतो तर तुम्ही एवढ्या उन्हात आला असता का? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
समृद्धी महामार्गाप्रमाणे विमानतळ बनवणार
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जबरदस्ती कुणाची जमीन घेतली जाणार नाही. जमीन संमतीने घेऊन त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. ज्या लोकांचा विमानतळाला विरोध आहे. त्यांना बाजूला राहू द्या. हा प्रकल्प आपल्याला सर्वांच्या संमतीने करायचा आहे. एखादा एअरपोर्ट आल्यानंतर त्या भागामध्ये कसा फायदा होतो. हे तुमच्या लक्षात येईल. लोकांच्या हिताचा जो काही पुरंदरचा प्रकल्प आहे. ते विमानतळ मला वाटते दुसरीकडे नेण्याचा कोणीतरी प्रयत्न करत होते. आणि मग तो आता थांबलेला आहे. जे चांगले प्रकल्प आहेत. ते पुढे नेणारच, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
घोषणांचा पाऊस
गुंजवणीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटी दिले जाणार, उरुळी पाणी पुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपये दिले जाणार, पुरंदर उपसासाठी पाणीपट्टी पुन्हा 19 टक्के केली जाईल, दिव्यात बाजार समितीसाठी ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील, कुठलाही प्रकल्प तुमच्या संमत्तीने घेतला जाईल, असे शिंदे यांनी नमूद केले.
“राष्ट्रवादीने सगळी तिजोरी गिळली’
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांती घडवली तर पाठीमागच्या काळामध्ये गुलालाची कापड धुवायची राहिली तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या दावणीला बांधले गेलो. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सगळी तिजोरी गिळून टाकली आम्ही एक एक करून सगळे बाहेर गेलो तरी यंत्रणेला थांगपत्ता लागला नाही. काय यंत्रणा आहे, अशी तोफ आमदार शहाजी पाटील यांनी डागली.