पुणे – कॉंग्रेसने रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं दुर्देवी आहे. त्यांनी आरबीआयची प्रतिमा मलिन करू नये. राहुल गांधी हे दुसऱ्यांना चोर म्हणण्यात माहीर आहेत. पण, दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवलाय, असा टोला लगावत रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या निधीबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
पुण्यात प्राप्तिकर आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर टीका केली. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, वस्तू व सेवा केंद्राचे मुख्य आयुक्त वसा शशागिरी राव, सीबीआयसीचे चेअरमन पी.के. दास, सीबीडीटीचे चेअरमन पी.सी. मोदी, आयकर विभागाच्या अध्यक्ष अनुराधा भाटिया आदी उपस्थित होते.
सरकारला किती निधी द्यायचा, याचा निर्णय आरबीआयच्या समितीने नेमून घेतला. समितीच्या सात बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान या समितीचे अध्यक्ष होते, असेही सीतारामन यांनी सांगितले.
पैशांच्या विनियोगावर चुप्पी
रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या निधीचा कशासाठी वापर करणार? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल दिली. “आरबीआयच्या पैशाचा वापर कशासाठी केला जाणार, हे आताच सांगता येणार नाही. त्याबाबतचा अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, जीएसटीमध्ये कपात करणं माझ्या हातात नाही. त्याचा निर्णय जीएसटी परिषदेलाच करायचा आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रकारचे उद्योजक महत्त्वाचे
देशातील सूक्ष्म, अतिसूक्ष्म, लघू, मध्यम व मोठ्या अशा सर्व प्रकारचे उद्योग व उद्योजक आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांना विनातक्रार व्यवसाय करता यावा, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच, सध्या देशातील “टायर टू सिटीज’ मधील उद्योजकांना नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर काय उपाय करता येतील, यावर चर्चा करण्यासाठी या बैठका घेण्यात येत आहेत. त्यांच्या अडचणी मी समजून घेतल्या असून त्यावर लवकरच उपाय केला जाईल, असेही सीतारामन यांनी सांगितले.