मुंबई – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिलला मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
या निवडणुकीसाठी भाजप पक्षाने कंबरकसली असून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगांव आणि मंगळवेढा शहरात येथे सभा घेतल्या या सभांदरम्यान त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली.
यावेळी मांडलेले मुद्दे :
– लोकशाहीत मताचा अधिकार हा महत्त्वाचा अधिकार असतो. या जुलमी सरकारविरूद्ध मतदानाचा पहिला अधिकार पंढरपूर विधानसभा क्षेत्राला प्राप्त झाला आहे. ना कर्जमाफी, ना नुकसान भरपाई! एक नवीन पैसा मदत या सरकारने केली नाही.
-
पंढरपूरमध्ये विठुमाऊलीच्या मंदिराबाहेर फुलं, गुलाल, बुक्का विकणार्याला एक रूपयाची मदत नाही आणि दारू विकणार्याला लायसन्समध्ये सवलती दिल्या. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. गरिब, दीन-दलितांशी यांना काहीच देणेघेणे नाही.
-
महाराष्ट्रात पहिल्यांदा इतिहासात पोलिसांच्या माध्यमांतून खंडणी गोळा करणारे सरकार पहावे लागले.राजकारणाचे गुन्हेगारीकरण पाहिले होते. पण, पोलिसांना टार्गेट देणारे नेते पहिल्यांदाच पाहिले. यात आमचं पोलिस दल बदनाम करून टाकलं.
-
मराठा आरक्षण या सरकारने टिकू दिले नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाला सुद्धा धक्का लागला. सध्या कोरोनामुळे निवडणुका होत नाहीत. पण, पुन्हा निवडणुका होतील, तेव्हा ओबीसींसाठी एकही जागा असणार नाही.
-
राज्यात सत्तेत आलेलं सरकार हे आधी होते महाविकास आघाडी…एका वर्षांत झालं ते महाविनाश आघाडी आणि आता ते ओळखलं जातंय महावसुली आघाडी. म्हणून मंगळवेढा – पंढरपूरच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवावी