दौंड तालुक्याच्या राजकीय पटलावर आमदार ऍड. राहुल कुल यांनी आपली मांड पक्की केली आहे. तळागाळातील प्रश्न, आरोग्याच्या समस्यांचा निपटारा, अभ्यासू मांडणी, मुद्देसूद भाषण, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भक्कम फळी आदीमधून कुल यांनी तालुक्यासह राज्यात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रासप ते भाजप असा प्रवास करताना त्यांनी कधीही कार्यकर्त्यांशी बांधिलकी कमी होऊ दिली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील एक तडफदार नेतृत्व दौंडला लाभले आहे. दिल्लीदरबारी केंद्रीय मंत्र्यांशी विकासकामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून कुल यांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकसुमने…
दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार ऍड. राहुल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मला सार्थ अभिमान वाटत आहे. दौंड तालुक्याचे देशाच्या व राज्याच्या राजकारणात नाव झळकायला लावणारे उमदे व तरुण नेतृत्व म्हणून दादांकडे संपूर्ण दौंडसह जिल्हा आशेने पाहत आहे. तत्कालीन भाजप सरकारच्या काळामध्ये दौंड तालुक्यात भरीव विकासकामे झालेली आहेत.
राज्याच्या राजकारणात 2014 नंतर उलथापालथ झाली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची “नमो’ची लाट देशभर उसळली होती. बहुतांशी राज्य कमळाच्या अधिपत्याखाली आले. अशा स्थितीत भक्कम समजला जाणारा राष्ट्रवादी पक्ष सोडून राहुल कुल यांनी तालुक्यात शे-पाचशे कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय समाज पक्षाशी संधान बांधले. 2014 मध्ये इतिहास घडला. आमदार कुल हे रासपमधून निवडून आलेले एकमेव आमदार ठरले होते. त्यांच्या विजयाने ऍड. कुल हे संपूर्ण राज्याला परिचित झाले. दौंडची जनता कामे करणाऱ्या नेत्याच्या मागे उभी राहते, हे जनकौलमधून स्पष्ट झाले.
दौंड तालुक्यात कोणीही निवडून आले तरी, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला, हे सूत्र ठरलेले होते, त्यामुळे एकप्रकारे मुस्कटदाबी होत होती. यातूनच कुल यांना तालुक्यात विकासकामे करताना अडचणी येत होत्या. दौंडचा मूलभूत आराखडा तयार नव्हता. सुभाषआण्णांनी केलेले रस्ते आईसाहेब तथा तत्कालीन आमदार रंजना कुल यांच्या कारकिर्दीत दुरूस्त झाले. कालव्याची आवर्तने विरोधकांनी पाचवरून तीनवर आणून ठेवली होती. आरोग्याच्या सुविधांबाबत केवळ आश्वासने दिली होती. याकरिता त्यांच्याच पुढे उमेदवारीसाठी हात पसरणार नाही, हेसुद्धा नक्की ठरवले होते.
माझ्यावर जनतेचा विश्वास असेल तर, जनता मला निवडून आणेल, असा त्यांचा त्यावेळी ठाम विश्वास होता. तालुक्यातील ही स्थिती बदलण्याकरिता आमदारकी लढविण्याचा विचार केला. त्यामुळेच उमेदवारी घेताना पक्ष पाहिला नाही. निवडून आल्यानंतर सहा वर्षांत मोठी विकासकामे केली. दौंड तालुक्याला पर्यावरणाचे वरदान लाभले आहे. नियमबाह्य गोष्टी दादांना पटत नाहीत. पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारा विकास काय कामाचा, असे ते परखड मत मांडतात.
दौंड तालुक्याचा शेतकरी कष्टाळू आहेत. पण, विरोधकांना त्याची जाणीव नाही. त्यामुळेच जलसिंचन योजनांकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी कालव्याला येणारे पाण्याचे आवर्तन नियंत्रित करणे, बेबी कालव्याचे काम पूर्ण करणे, ही भरीव कामे दादांनी केली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाण्याबाबत व मुळशी धरणाचे पाणी वळविण्यासाठी जी संपूर्ण राज्यातून समिती स्थापन केली होती. यामध्ये दादांना त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे स्थान दिले होते.
अष्टविनायक मार्ग, दौंड शहरातील अंतर्गत रस्ते, गावोगावी पाणंद रस्ते व संपूर्ण राज्याला जोडणारा दौंड शहरातून जाणाऱ्या इतर छोटे, मोठे रस्ते दादांनी मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात केलेली आहेत. फक्त रस्त्यांचीच कामे न करता वीज, पाणी आदी समस्या अतिशय चांगल्या प्रकारे सोडविल्या आहेत.
दौंड तालुका हा पाण्याबाबतीत सुजलाम् सुफलाम् तालुका म्हणून ओळखला जातो. यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून त्याला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो.
त्यामुळे बळीराजाच्या दूधाला योग्य बाजारभाव मिळावा म्हणून दादांनी देशात अग्रेसर असलेल्या अमूल दूध संस्थेशी आपल्या सुभाष आण्णा कुल दूध उत्पादक संघाचा करार केला आहे. त्यामुळे आजघडीला इतर दूध संस्थांपेक्षा दोन रुपये बाजारभाव जास्त मिळत आहे. त्यामुळे दूग्ध व्यवसायाला वेगळीच चालना मिळाली आहे. दौंड तालुक्याला मिळालेल हे उमदे तरुण नेतृत्व आज दौंड तालुक्याच नाव देशात झळकवण्यासाठी अहोरात्र काम करून तालुक्याचा स्वाभिमान, अभिमान जागृत करीत आहेत. म्हणूनच म्हटलं जातंय, “आपलं दौड बदलतंय, स्वाभिमानाने झेपावतंय, याचा दादांच्या रुपाने आम्हाला सार्थ अभिमान आहे.
प्रा. कुलदीप दिगंबर यादव (हाजबे) सामाजिक कार्यकर्ता, वासुंदे,
– शब्दांकन : विशाल धुमाळ (दौंड)