क्वारंटाइनमध्ये श्रद्धा घरी बोअर झाली असेल म्हणून परवा श्रद्धाला फोन केला. ती कसेतरी अडखळत बोलली. तिचा दादा म्हणाला, मी नंतर बोलतो आता स्वैपाक करत आहे. क्वॉरोंटाईनमुळे एकही कामवाल्या मावशी नाही.सध्या सगळी ड्युटी माझी आहे.
या एका वाक्याने मी भूतकाळात गेले. किमान दीड वर्षांपूर्वी एक तरुण मुलगा माझ्या सेंटरला आला. त्यानंतर एक किमान विशीची सेरेब्रल पाल्सी असलेली मुलगी गाडीतून उतरली आणि आणि दोन्ही हात आणि पायांचा आधार घेत बसत बसत आली.
नंतर एक बाई उतरल्या त्यांना अर्धांगवायू झाल्याचे दिसत होते. गाडीतून आणखी एक जख्खड आजी उतरल्या, किमान नव्वदी पार केलेल्या असाव्या. या तिघींनाही गेटपासून माझ्या केबिनमध्ये यायला म्हणजे किमान दहा पावले चालायला वीस मिनिटे लागलीत.
पुढची कथा थक्क करणारी होती. आलेला तरुण खूप मोठा नसून 27-28 चा असावा. नाव स्वप्नील वैद्य. श्रद्धा ही त्यांची चुलत बहीण. अर्धांगवायू झालेली श्रद्धाची आई म्हणजे स्वप्नीलची काकू आणि त्या म्हाताऱ्या बाई ही श्रद्धा आणि स्वप्नीलची आजी.
स्वप्नील श्रद्धाच्या ऍडमिशनसाठी आले होते. श्रद्धाचे वडील पोलिसात होते; मात्र चार वर्षांपूर्वी ते क्षयरोगाने गेले. ते तब्बल दोन महिने दवाखान्यात होते. तेव्हा दोन्ही महिने स्वप्नीलनेच सेवा केली; तीही मनापासून. त्या बदल्यात त्यांनी स्वप्नीलकडून वचन घेतले की, तू श्रद्धाला आणि श्रध्दाच्या आईला कधीच अंतर देणार नाही आणि या शब्दाला स्वतः स्वप्नील जागलेही.
या तीन अश्या बायांना सांभाळण्यासाठी स्वप्नीलने आपले घर सोडले. स्वप्नीलला वडील नाही. आई पोलिसात आहे. भाऊ वहिनी आयटी कंपनीत कामाला आहे. स्वप्नीलची लक्ष्मी रोडला कपड्यांची दोन दुकाने आहेत. स्वप्नीलने या तिघींना सांभाळण्यासाठी स्वतःचे सुखसुखी जगणे सोडले त्यासाठी स्वतःचे लग्नही केले नाही.
स्वप्नील म्हणतात, यांना घेऊन राहायचे म्हणून मी वेगळं घर शोधत होतो. मी वारजाला रहायचो म्हणून वारजापासून घरे शोधणे सुरू केले. लोक ‘हो’ म्हणायचे, पण माझ्या परिवाराची ही कथा सांगितल्यावर लोक ‘नाही’ म्हणायचे. वारजापासून घर शोधत शोधत मी बिबवेवडीच्या राजस सोसायटीपर्यंत पोचलो.
वारजे ते बिबवेवाडी मी 52 घरे पहिली आणि त्या सगळ्यांकडून माझ्या घरच्या या तीन बायांना बघून नकार मिळायचा. ज्या वचनपूर्तीसाठी स्वप्नील निघाले होते; त्यात माणुसकीचा भाग सगळयात मोठा होता पण पुणेकरांकडून हा माणुसकीचा मोठा धक्का त्यांना मिळाला होता.
श्रद्धाचा दादावर विशेष जीव आणि दादाचाही श्रद्धावर! पण या तिघींच्या बौध्दिकतेच्या कसोटीवर उतरताना स्वप्नीलची खूप कसरत होते. ती दिव्यांग असल्याने चालता येत नाही. मुलगी म्हणून सगळ्या नैसर्गिक क्रिया तिच्या होतात आणि आई अधू असल्याने श्रद्धाचे काहीच करू शकत नाही.आजी नव्वदीची त्यामुळे तीही शारीरिक अधुच.
मला हे सगळे सांगितल्यावर मी स्वप्नीलला साष्टांग दंडवतच घातला. जिथे लोक पोटच्या मुलांसाठी करत नाहीत, तिथे वयात आलेला हा मुलगा स्वत:च्या सगळ्या आवडी-निवडींना बगल देऊन स्वतःच्या आयुष्याची आहुती देतो हे कौतुकास्पदच!
स्वप्नील म्हणतो, हे करण्याची उर्मी मला माझ्या आईकडूनच मिळालीय. आईसुद्धा अशीच दुसऱ्यांसाठीच झटणारी. आई आजही पोलिस विभागात कार्यरत आहे. आईसुद्धा करोनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कार्यरत आहे आणि इकडे स्वप्नील या तिघींसाठी!
दिवसात सोसायटीत कुणा कामवाल्यांना प्रवेश नसल्याने आणि श्रद्धाची शाळाही नसल्याने सगळी कामे आता स्वप्नील वर पडली आहे . मी फोन केला तेव्हा ते मिक्सरमध्ये कणिक भिजवत हिते. रोज यु ट्यूब वर भाज्या बघतात आणि करतात. घरची झाडझुड, फरशी ,भांडी आणि या तिघींची जबाबदारी पुर्णतः आता स्वप्नील ने स्वीकारली आहे. स्वप्नील म्हणतात, मी नाही करणार तर कोण करेल? माझे पुन्हा हात इथूनच जुळतात त्यांच्यासाठी.
त्यांचे करण्यासाठी कुणा नातेवाईकांना बोलावता नाही येणार का? त्यावर त्यांचे उत्तर होते ,माझ्याशिवाय त्यांचे आता कुणीच नाही. काकू लग्नानंतर अश्या झाल्या. काकांनीच सगळे घर सांभाळले .नंतर मुलगी अशी झाली तरीही काकांनीच घर सांभाळले. आता ते नाहीत तेव्हा मिच आहे करणारा. शिवाय आज्जीच्या आजारपणात स्वप्नील एकटेच आजीची काळजी घ्यायला दवाखान्यात असायचे म्हणून त्यांना त्यांचे एक दुकान बंद करावे लागले.
हाही आयुष्याचा खूप मोठा समझौता त्यांनी केलाय. त्यांना दुकानाचा माल आणायला मुंबईला जायचे असेल तरी दुकानातला एक मुलगा घरी ठेवावा लागतो; त्याशिवाय त्यांना घर सोडता येत नाही. श्रद्धाला त्यांनी एका संस्थेत ठेवले होते मात्र तिथल्या हलगर्जीपणामुळे त्यांनी तिला तिथून आणले आणि तिची जबाबदारी ही शेवटपर्यंत माझीच जबाबदारी आहे आणि ती मी संभाळीन, असेही ते हसून सांगत होते.
स्वप्नीलला मी कधी वैतागलेले, चिडलेले पाहिले नाही. ज्या वयात मौज मजा करावी, लग्न करून संसार थाटावा त्या वयात स्वप्नील हे शिवधनुष्य लीलया पेलत आहे याचे कायम कौतुकच आहे. स्वप्नील आपल्याच माणसासाठी जरी हे करत असले तरी या वेगवेगळ्या कारणाने अधू असलेल्या तीन बायांना सांभाळणे अंगावर येण्यासारखे आहे. पण खरे सांगू स्वप्नील साठी शब्द थांबतात, नतमस्तक होऊन, हात नमस्कार करून फक्त पाणावलेले डोळे बोलतात! त्या स्वप्नीलला नमन!!