मुंबई – राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. या साऱ्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून झाली, मात्र राज्यातील जनतेने महाराष्ट्र धर्म पाळला याचे कौतुक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला.
मंत्री आव्हाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याला खरी ओळख दिली व ही ओळख फुले-शाहू-आंबेडकरांनी जपली. इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही. इथे जातीयवाद जास्त वेळ टिकत नाही, असे बोलून आव्हाड यांनी राज्यातील जनतेचे कौतुक केले.
राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रोश मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे. याबाबतही मंत्री आव्हाड यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केले.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असणार आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर मी त्यांच्या टेबलासमोर ठाण मांडून ते पदरात पाडून घेतले असते, असा दावा देखील मंत्री आव्हाड यांनी यावेळी केला.