रेडा (प्रतिनिधी/नीलकंठ मोहिते) – इंदापूर तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या,यामध्ये 60 ते 65 टक्के जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे गावपातळीवर देखील उभी असल्याचे,स्पष्ट चित्र निवडणूक निकालानंतर दिसले आहे.त्यामुळे 37 ग्रामपंचायतीचे सरपंच,भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत.म्हणूनच इंदापूर तालुका हा भाजपचा विचाराचा निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थाने तालुक्यातील जनता सत्तेच्या मागे जाणारी नाहीतर,सत्तेच्या मागे कायमस्वरूपी खंबीर उभी राहणारी आहे.असा विश्वास राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर शहरातील शहा संस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान सोहळा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे अध्यक्षस्थानी होते.इंदापूर पंचायत समितीचे सभापती स्वातीताई शेंडे,उपसभापती संजय देहाडे,माजी सभापती मयुरसिंह पाटील,विलासराव वाघमोडे, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासो पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, मारूतराव वणवे,उदयसिंह पाटील,माऊली चवरे,भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रपती होणे खूप सोपे आहे.मात्र ग्रामपंचायत सदस्य होणे ही प्रक्रिया फार अवघड असते. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायती समाजकारणाचे साधन आहे ज्या लोकांचा जनसंपर्क जास्त असतो त्यांना गावातील जनता साथ देते व सदस्य बनवते.अशीच साथ भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे गावागावात खंदे समर्थक असल्यामुळेच,तब्बल 37 ग्रामपंचायती वर वर्चस्व तालुक्यात मिळाले आहे.
कैलासवासी शंकरराव भाऊ यांच्या विचाराने इंदापूर तालुका बांधलेला आहे, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी गाव पातळीवर अनेक जणांना फोन केले परंतु,या गोष्टीचा कुठेही परिणाम झालेला नाही.तालुक्यातील जनता सत्तेच्या मागे नाही तर सत्याच्या मागे उभी राहीली.आम्ही मंत्री असताना कधीही ग्रामपंचायत स्तरावर लक्ष दिले नाही.मात्र इंदापूर तालुक्यात आता वेगळे चालले आहे.जर आम्ही अधिकचे लक्ष दिले असते तर,आणखी दहा ग्रामपंचायती भाजपच्या विचाराच्या वाढल्या असत्या अशीही माहिती हर्षवर्धन पाटील त्यांनी दिली.
विरोधी पक्षाची सभा मागील काही दिवसात इंदापूरला झाली यामध्ये चिट्ठी आणि सिटी यापलीकडे काही झाले नाही.चुकीची माहिती दिल्याने,इंदापूर तालुका दूध संघ चालू असताना देखील,बंद पडल्या चा गवगवा विरोधकांनी केला.परंतु मागील काही महिन्यातच जवळपास इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 50 कोटी रुपये दूध संघाच्या माध्यमातून पेमेंट म्हणून झाले आहे.तर आता एक लाखापर्यंत दूध संकलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण करणार आहे. ग्रामपंचायतीला निधी थेट केंद्राकडून मिळत असतो, त्यामुळे राज्य सरकारकडून काही अपेक्षा करू नका. वेळ पडली तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही इंदापूर तालुक्यातील आपल्या विचारांच्या ग्रामपंचायतींची,यादी घेऊन जाऊन थेट केंद्राचा निधी ग्रामपंचायतीला वळता करू असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
इंदापूर तालुक्यातील जनतेने,गाफील न राहता आगामी काळात लढाई अस्तित्वाची आहे.सामान्य माणसांसाठी आपल्याला काम करावयाचे आहे.या विचाराने जिल्हा परिषद,पंचायत समिती, सहकारी कारखाने व जिल्हा बँक निवडणुकीत यश संपादन करून बाजी मारायचे आहे.विधानसभेत थोड्या मताधिक्क्याने आपणास पराभव घ्यावा लागला,परंतु कमी पडलो म्हणून घरात बसलो नाही.आम्ही जनतेच्या सुखदुःखात आहोत.याची पोचपावती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील जनतेला बघायला मिळेल. आगामी काळात देखील भाजपचा दरारा तालुक्यात असेल.असाही विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की,विधानसभेची निवडणूक झाली.यामध्ये पराभव झाला मात्र या पराभवात कोणीही न खचता,आपला स्वाभिमान जागा ठेवत,समाधान कारक तालुक्यामध्ये ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जनतेने दिलेले आहेत.आम्ही हर्षवर्धन पाटील यांना मनापासून खंबीर साथ देऊ व जनतेच्या सुखदुःखात कायम बरोबर राहू.अशीही ग्वाही माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यासाठी इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य,सरपंच उपसरपंच, व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे चिन्ह कमळ चिन्ह असलेली पट्टी गळयांत टाकुन सन्मान करण्यात आला.
” इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यासाठी आलेला निधी केंद्र सरकारचा “
इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्याची कामे अत्यंत वेगाने चालू आहेत यामध्ये केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून डाळज वालचंदनगर,पालखी मार्ग,यासाठी चारशे कोटीच्या आसपास निधी आलेला आहे.त्यामुळे हा निधी केंद्राचा आहे.राज्य सरकारचा नाही,तालुक्यातील जनतेला दळणवळणाच्या सुविधा या निधीच्या माध्यमातून आगामी काळात उपलब्ध होतील.अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन येथे भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.