भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात एकूण रेल्वे स्थानकांची संख्या सुमारे ८००० आहे. बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात, कारण ते स्वस्त आणि आरामदायी आहे. ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोकांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारतात अशी एक ट्रेन आहे, ज्यामध्ये लोक तिकिटांशिवाय प्रवास करतात. तुमचा यावर विश्वास बसत नाही? फक्त तुम्हीच नाही, ज्याने हे पहिल्यांदा ऐकलं असेल त्याचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावणारी ही ट्रेन नांगल आणि भाक्रा दरम्यान धावते. भाक्रा-नांगल धरण पाहणाऱ्यांसाठी ही ट्रेन चालवली जाते. या ट्रेनबद्दल आणि त्यात भाडे का आकारले जात नाही याबद्दल चला जाणून घेऊया.
भाक्रा- नांगल धरण पाहण्यासाठी जाणाऱ्यांना या ट्रेनने मोफत प्रवास करता येईल. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे याचे डबे लाकडापासून बनवलेले असून त्यात टीटी नाही. ही ट्रेन डिझेलवर चालते आणि दररोज 50 लिटर तेल वापरले जाते.
भारताच्या या स्पेशल ट्रेनला आधी १० डबे असायचे, पण आता फक्त तीन डबे आहेत. यामध्ये एक डबा पर्यटकांसाठी तर एक डबा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
या ट्रेनमध्ये लोकांना मोफत प्रवास करता यावा, हा एक उद्देश आहे. लोकांना भाक्रा नांगल धरण बघता यावे म्हणून ट्रेनने मोफत प्रवास केला जातो. आजच्या पिढीतील लोकांना हे धरण पाहून समजेल की ते बांधण्यासाठी किती अडचणी आल्या असतील.
ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे चालवली जाते. ट्रेन धावण्यासाठी डोंगर कापून ट्रॅक टाकण्यात आला. ही ट्रेन सुमारे ७३ वर्षांपूर्वी १९४९ मध्ये सुरू झाली होती. या ट्रेनने दररोज २५ गावांतील सुमारे ३०० लोक मोफत प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो.
भाक्राच्या आसपासच्या गावातील लोक या ट्रेनने प्रवास करतात. तुम्हालाही भाक्रा- नांगल धरण पाहायचा असेल, तर तुम्ही या ट्रेनने मोफत प्रवास करू शकता.