नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे तबलीगीसारखी घटना घडली आहे. त्यामुळे अख्खा देश ढवळून निघाला आहे. दरम्यान, जमातच्या घटनेवर काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कडक आणि परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. या घटनेवर तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी, असं आवाहन दलवाई यांनी केले आहे. सरकारच्याही अनेक चुका झाल्या, पण सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही. पहिली लढाई कोरोनाशी आहे. विदेशातून आलेले लोक कसे काय फिरत होते. या गोष्टीचे समर्थन कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
तबलीगी जमातच्या घटनेवरुन हुसेन दलवाई यांनी टीका करत असताना हा प्रश्न हिंदु-मुस्लीम असा प्रश्न नाही तर कोरोनाशी एकत्रित लढण्याचा आहे. मुस्लीम समाज जनजागृती करण्यात कमी पडला हे कबूल करायला हवे. 800 जमात कार्यकर्त्यांचे विसा बॅन केले याचेही समर्थन हुसेन दलवाई यांनी केले आहे.
मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनल्याचे बोलले जात आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु, या आदेशाचे उल्लंघन करत कार्यक्रमाचे आयोजन झाले .