कोलकाता – पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी आणि पक्षाला सत्ता संपादीत करण्यासाठी अन्य पक्षांतील नेत्यांची गरज आहे, पण या बाहेरच्या नेत्यांना पक्षात घेतले जात असले तरी पक्षातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलेले जाणार नाही, असे स्पष्टीकरण पश्चिम बंगाल प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी दिले आहे.
पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की आम्ही भाजप मध्ये सरसकट सर्वांनाच प्रवेश देत नाही. प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे असे ते म्हणाले. पक्षाची शिस्त आणि नियम-निर्बंध सर्वांनाच पाळावे लागेल असे ते म्हणाले. पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आणि पक्षाचा सत्तेचा दावा मजबूत करण्यासाठी बाहेरील पक्षाच्या लोकांची गरजच असते असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.