बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे लावून धरणार
नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि हरियाणातील जनता भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्या दोन्ही राज्यांत आम्ही जिंकू, असा विश्वास कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या आदी जनतेशी निगडीत मुद्दे विधानसभा निवडणुकांत लावून धरणार असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी प्रतिक्रिया दिली. मंदी आणि निर्बंधांसाठी सत्ताधारी भाजप ओळखला जाऊ लागला आहे. विधानसभा निवडणुकांत जनता भाजपला चोख प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी म्हटले. तर जनतेशी निगडीत मुद्दे प्रचारात उपस्थित केले जातील, असे कॉंग्रेसचे आणखी एक प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले.
15 लाख लोक बेरोजगार झाले. मागील तीन महिन्यांत शेअर बाजारात 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ते मुद्दे पक्ष मांडेल. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा मुद्दा अतिशय गंभीर बनला आहे. हरियाणात भ्रष्टाचार वाढला असून कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे, असा आरोपही त्यांनी केला.