साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांचे मत
पुणे – छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कारखाने आणून तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला आणि पुन्हा नव्याने चळवळ सुरू केली, तर त्यांचे नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यांनी लोकांमध्ये जावे, त्यांचा विश्वास परत मिळवावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहून त्यांनी काम केले असते, तर त्यांना याहीपेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणे हे कदाचित लोकांना आवडले नाही, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
सेनापती बापट रस्त्यावरील पत्रकार नगर समोरील शिवाजी सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सातारा लोकसभा निवडणुकीविषयी गप्पा मारल्या.
ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती. विकासासाठी पक्षांतर केल्याचे कारण जनतेला पटले नाही. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावे अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो. केवळ तेरा दिवसात संपूर्ण मतदार संघात पोहचणे शक्य नव्हते. राष्ट्रवादी आणि कौंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याने विजय मिळाला, असे पाटील म्हणाले. यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या कामाचे कौतुकही पाटील यांनी केले.