संगमनेर -अनेक वस्तूंचा जीएसटी वाढवला असून त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरत चालली आहे. याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था ही घसरत चालली आहे, आणि ही घसरण कधीही फायद्याची नसते. महागाईकडे नागरिकांचे लक्ष जाऊ नये, म्हणून धर्माच्या आणि वादाच्या गोष्टी काढून जाणीवपूर्वक नागरिकांना अंध बनवलं जातं असून लोकांची मती बंद करून बधीर केलं जातं असल्याची टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्रावर केली.
येथील कार्यकर्त्यांशी संवाद हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात पुढे म्हणाले, की जीवनावश्यक गोष्टींची महागाई वाढल्याने सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. काही दिवसांपूर्वी चार वर्षे सैन्यदलात भरती होणारी योजना केंद्र शासनाने आणली. परंतु युवकांनी त्याचा जोरदार विरोध केला असेच पोटाचा प्रश्न उभा राहिल्यावर एक दिवस असा येईल, त्या दिवशी सामान्य जनता पेटून उठेल आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरेल. अशी टीकाही थोरात यांनी केंद्र सरकारवर केली.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच माजीमंत्री थोरात हे संगमनेरात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमातही संगमनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. धर्माचा विचार करण्यापेक्षा विकासाचा विचार करावा हा कॉंग्रेसचा विचार आहे. लोकांचे विचार बदलायला लागल्यामुळे लोक दुसरीकडे जात आहे, म्हणून कॉंग्रेसला कठीण दिवस आले आहेत. राज्यघटनेने जे मूलभूत तत्व दिले आहेत. तेच कॉंग्रेसचे तत्त्वज्ञान आहे आणि हेच देशासाठी शाश्वत आहे, असे थोरात म्हणाले.