शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि आपले बहुमताचे सरकार असल्याचे सिद्ध केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासोबत १६० हुन अधिक आमदारांनी मतदान केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे आलेले लोक ED मुळे आले असल्याचे विधान केले आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
मुख्यमंत्र्यांसाठी झालेल्या अभिनंदन भाषणात सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांनी केलेली शाब्दिक फटकेबाजी सभागृहात पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीची सुरुवात ते त्यांच्या आयुष्यात टर्निग पॉईंट ठरलेल्या अनेक प्रसंगांचे वर्णन यावेळी फडणवीस यांनी केले.
विरोधकांकडून सत्तेत गेलेल्या अनेक आमदारांवर इडीमुळे घाबरल्याचे आरोप देखील यावेळी करण्यात आले. विरोधकांच्या ईडीबाबतच्या आरोपाला फडणवीस यांनी चातुर्याने उत्तर दिलं. आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत हे खरं आहे पण ही ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
आमदारांची गैरहजेरी
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख अनुपस्थित राहिले. उशिरा आलल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. तर प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर दोन्हीही दिवस अनुपस्थित राहिले. जितेश अंतापूरकर यांचं लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी आहेत.