डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
पुणे – ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन करीत असताना वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याने सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दंड ठोठावला. मुलाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून 3 लाख, तर तक्रार खर्च म्हणून 1 लाख रुपये 10 टक्के व्याजदराने देण्याचे आदेश दिले.
आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि सदस्या क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. अभिजित जाधवच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे वडील संभाजी जाधव (वय 44, रा. कोथरूड) यांनी सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. चारुदत्त आपटे, डॉ. तुषार परमार आणि डॉ. वैजयंती बेलले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. अभिजित याची 4 ऑक्टोबर 2006 रोजी मेंदूची शस्त्रक्रिया झाली. यामध्ये कोणताही धोका नाही, असे आश्वासन ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टरांनी दिले होते. मात्र, शस्त्रक्रियेतील संभाव्य धोक्यांची कल्पना डॉक्टरांनी दिली नव्हती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अभिजितचा मृत्यू झाला, असे निकालात नमूद केले आहे.
ऑपरेशन झाल्यानंतर मुलाची हालचाल बंद होती. त्याच्या डोक्यात पाणी झाले होते. एक महिन्यातून अधिककाळ मुलगा ऍडमिट असताना त्याच्या नाका-तोंडातून उलट्या झाल्यानंतरही त्याकडे लक्ष दिले नाही. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला, अशी तक्रार जाधव यांनी दिली होती. तर शस्त्रक्रिया मोठी असल्याने त्याचे तत्कालिक किंवा दूरगामी स्वरुपाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अभिजितची गाठ मेंदूतल्या संवेदनशील भागाला घट्टपणे चिकटली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची शुद्ध शाबूत होती. त्याच्या जखमेतून पाणी येण्यावर उपचार सुरू होते, असे डॉक्टरांनी आयोगास सांगितले.
रुग्णालयाचे कृत्य अमानवीय
अभिजित हा संभाजी जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. त्या मृत्यूबद्दल नुकसानभरपाई म्हणून जाधव यांनी 19 लाख 99 हजार रुपयांची मागणी केली होती.