पिंपरी – लॉकडाऊनमुळे अनेक बॅंकांमध्ये मनुष्यबळ मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बॅंक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीज बिलाकरिता धनादेश दिला असेल, तर बॅंकांकडून धनादेश वटविण्यास उशीर होत आहे. वीज बिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊन्स झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड पुढील वीजबिलात आकारला जाणार आहे.
जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीजमीटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे.
सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे बॅंकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून, वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत आहेत. ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. ही बाब टाळण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाइन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.