कालवा कृती समितीच्या आंदोलकांना प्रशासनाचे आश्वासन
अकोले – मुदतीत कामे न केल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कालवा कृती समितीच्या आंदोलकांना आज प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण अग्रक्रमाने टाकावे व अकोलेतील कालव्यांचे मंदावलेले काम शीघ्रगतीने सुरु करण्यासाठी मुदत संपलेली कामे काढून ठेकेदार बदलविण्यात यावा.
या दोन मागण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने धरणे आंदोलन संगमनेर प्रांत कार्यालयासमोर केले. तेंव्हा करण्यात आलेल्या आंदोलनात जलसंपदाने अकोलेतील ठेकेदार न्यू एशिअन कन्ट्रक्शन कंपनीस दिलेल्या मुदतीत इच्छित मशिनरी कामावर हजर करून जलसंपदाने दिलेला इष्टांक न गाठल्यास आधी दंडात्मक कारवाई करणार असून त्यानंतर कामे काढून घेणार असल्याचे आश्वासन दिल्याने समितीने आंदोलन मागे घेतले.
उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, सिन्नर आदी सात तालुक्यातील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प मंजूर होऊन 48 वर्ष उलटत आली आहेत. मात्र अद्याप या तुषार्त गावांना पिण्याचे व शेती सिंचनाचे पाणी मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवा कृती समितीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले.
त्यावेळी कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्या वतीने उप-कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी हे लेखी आश्वासन दिले. यावेळी संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.अहिरे, उपकार्यकारी अभियंता गायकवाड, जलसंपदाचे उप कार्यकारी अभियंता प्रमोद माने आदींसह कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, सोन्याबापू उऱ्हे, सचिव कैलास गव्हाणे, संघटक नानासाहेब गाढवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता व प्रांताधिकारी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यास आंदोलनस्थळी येण्यास नकार दिला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी दुसरे निवेदन तयार करून त्याच जागेवर प्राणांतिक उपोषण करण्याचे बजावल्याने व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, व जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर अधिकारी आंदोलनस्थळी आले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब यादव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.