नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर येत्या 5 ऑगस्टला सुनावणी घेतली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर पुढील आठवड्यात सुनावणीला घेतल्या जाणाऱ्या याचिकांची जी यादी प्रसारीत झाली आहे त्यातून ही माहिती मिळाली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार नाही. पेगॅसस प्रकरणात ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यात ज्येष्ठ पत्रकार एन राम, शशीकुमार यांच्या याचिकांचा समावेश आहे.
पेगॅसस प्रकरणी विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले आहे, तरीही सरकार त्यावर चर्चा करण्यास राजी नाही, तसेच या प्रकरणाच्या चौकशीचीही तयारी सरकारने दर्शवलेली नाही, त्यामुळे अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचा रस्ता धरला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून काय आदेश येतो हे पहाणे आता महत्त्वाचे ठरले आहे.