मुंबई : पेगॅसस प्रकरणावरून मागील काही दिवसांपासून एकच गोंधळ उडाला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान देखील पेगॅससच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ पाहायला मिळत आहे. देशातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.
खुद्द काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोन देखील या तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून विरोधकांचा विरोध तीव्र होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून लोकांना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर ट्वीटमधून निशाणा साधतानाच सामान्य जनतेला देखील इशारा दिला आहे. “सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय. तुमचे व्हिडीओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातंय. पेगॅसस हे फक्त राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.