नवी दिल्ली – पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विषयाशी संबंधीत स्थायी समितीने आयोजित केलेल्या बैठकीला गृह, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार खात्याचे अधिकारी आयत्यावेळी भलतेच कारण देऊन अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे या संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी लोकसभा सभापतींकडे तक्रार केली आहे.
या अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशाचा भंग करून शिस्तीचा भंग केला आहे, आणि या अधिकाऱ्यांचे ही वर्तवणूक संसदीय प्रथेचा एकूणच व संसदेचा अवमान करणारी आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी थरूर यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या संसदीय समितीतील सदस्यांनीही या कामी मदत केली नाही. भाजपचे सदस्य तेथे उपस्थित होते पण त्यांनी उपस्थिती पत्रकारावर स्वाक्षरीच केली नाही, त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विरोधकांनी या समितीचा वापर करून सरकारला बाध्य करण्याचा प्रयत्न केला पण सरकारने तोही हाणून पाडला आहे असा विरोधकांचा आरोप आहे. या प्रकरणात सरकार संसदेतही चर्चा करीत नाही आणि संसदीय समितीच्या बैठकीतही त्यावर कार्यवाही होऊ देत नाही अशी कॉंग्रेसची तक्रार आहे.