मुंबई – भाजप नेते आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत केलेल्या एका आक्षेपार्ह्य वक्तव्यावरून ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर पेडणेकर यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजप नेते शेलार यांनी वरळी येथील बीडीडी चाळीतील गॅस सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेनंतर पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह्य भाषेत टीका केली होती. शेलार यांनी जाहीर पत्रकार परिषदेत, ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात’ असं वक्तव्य केलं होत. शेलार यांच्या या वक्तव्यावर महापौर पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे.
महिला आयोगाने मागवला अहवाल
शेलार यांच्या या वक्तव्यावरून आता महिला आयोगाने देखील अहवाल मागवला आहे.
समस्त स्त्री जातीचा अवमान
‘मुंबईची महापौर ही एक महिला आहे. प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. असे असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यामुळे शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार करत’ असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.