पुणे – शेंगादाणा, गोटा खोबरे, तूरडाळ, साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या किरकोळ दुकानदारांविरोधात शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. शहराच्या विविध भागांतील तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल करून माल जप्त केला आहे.
करोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यातून भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दूध, गॅस सिलिंडर, वर्तमानपत्रे यासारख्या जीवनावश्यक वस्तू वगळल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात. अन्न आणि औषधांवाचून कोणावर उपासमारीची वेळ येऊ नये, हा यामागील उद्देश आहे. परंतु, समाजातील काही नतद्रष्टांनी या साथीची संधी साधत काळाबाजार सुरू केला आहे.
दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या साखर, डाळी, शेंगदाणे, साबुदाणा, सुके खोबरे हे पदार्थ जवळपास दीड ते दुप्पट दराने विकून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शहर पोलिसांनी अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.
बालेवाडीत कारवाई
बालेवाडी येथील अविष्कार बिल्डिंगमधील पन्नाराम पुनाजी चौधरी हा दुकानदार वरील वस्तू चढ्या दराने विकत असल्याप्रकरणी त्याच्याविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाख झाला आहे. तो शेंगदाणे 180 रुपये किलो, तूरडाळ 160 रुपये, मूगडाळ 155 रुपये, हरभरा डाळ 140 रुपये, सुके खोबरे 280 रुपये तर, साखर 48 रुपये दराने विकत होता.
खडकी बाजारातही सुरू होता प्रकार
खडकी बाजारातील गांधी चौकातील बी. एम. अगरवाल किराणा स्टोअर्समध्येही शेंगदाणे 140 रुपये, सुके खोबरे 220 रुपये दराने विकण्यात येत होते. दुकानाचा मालक गौरव राजेंद्र अगरवाल याच्या विरोधातही खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.